• New

    'जीसॅट १९' चे यशस्वी प्रक्षेपण

    भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) 5 जून 2017 रोजी, ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या पूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण ५ वाजून २८ मिनिटांनी श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून केले गेले. तब्बल ३१३६ किलो वजनाचं या 'जीसॅट १९'चं प्रक्षेपण 'एमके ३ डी १' रॉकेटच्या सहाय्याने केलं गेलं. या प्रक्षेपकाद्वारे भविष्यकाळात भारतीय अंतराळवीर भारतीय भूमीतून अवकाशात धाडणेही शक्य होणार आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे लागलं होतं.

    भारताला २.३ टनापेक्षा अधिक वजनाचे संपर्कयंत्रणा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी आतापर्यंत परदेशी जावे लागत होते. आता आपल्याला चार टन वजनाचा उपग्रहही अवकाशात पाठवणे शक्य होईल. त्यामुळे या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्णता तर मिळणार आहेच, शिवाय भारताला परदेशी ग्राहकही आकर्षित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

    भारताचे आतापर्यंतचे सर्वांत जास्त ‘वजनदार’ अशा ‘जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल मार्क-३’ अर्थात ‘जीएसएलव्ही एमके-३’ या उपग्रह प्रक्षेपकाचे वजन पाच पूर्णभारीत बोइंग जम्बो जेटइतके किंवा पूर्ण वाढ झालेल्या २०० हत्तींइतके भरते. सध्या हा प्रक्षेपक अनेकांचे लक्ष वेधून घेतो आहे. हे भारताचे भविष्य असून, याद्वारे भारतीय अंतराळवीर नेणे शक्य आहे.

    जीसॅट १९ उपग्रहाचे फायदे

    जीसॅट-१९ उपग्रहाद्वारे माहिती संपर्क तंत्रज्ञानात क्रांती होणार आहे. यामुळे डिजिटल इंडियालाही पाठबळ मिळणार आहे. विशेष म्हणजे या उपग्रहामुळे अधिक वेगवान इंटरनेट सेवाही मिळणार आहे.

    जीसॅट १९ उपग्रहाची वैशिष्ठ्ये:

    जीसॅट-१९ उपग्रहाचे वजन ३,१३६ किलो इतके आहे. भारतातील संपर्कयंत्रणा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याची शक्यता या उपग्रहात आहे. ‘जीसॅट-१९ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर तर या पूर्वीच्या सहा-सात दळणवळण उपग्रहांचे काम एकटा जीसॅट-१९ उपग्रह करणार आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या उपग्रहामुळे डिजिटल इंडिया मोहिमेला बळकटी मिळणार आहे

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad