• New

    चालू घडामोडी : 8 मार्च 2017

    लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच महिला टीसी
    ·       जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच महिला टीसींची नियुक्ती करण्यात आली आहे.
    ·       नीरू वाधवा आणि राधा अय्यर या दोन महिला मुंबई-सुरत इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासण्याचे काम करणार असून तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

    गांधीनगर (गुजरात) येथे स्वच्छ शक्ती 2017 हा महिला सरपंचाची परिषद पार पडली. स्वच्छ भारत चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सरपंचांचा  सन्मान करण्यासाठीचा हा कार्यक्रम होता.

    नारी शक्ती पुरस्कार 2016
    ·       महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या  निवड समितीने नारी शक्ती पुरस्कार 2016साठी  देशभरातून 31 नावे निश्चित  केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या मुमताझ काझी आणि रीमा साठे यांचा समावेश आहे.
    ·       मुमताझ काझी या  आशियातल्या पहिल्या महिला डिझेल रेल्वेचालक  आहेत. त्यांना 20 वर्षांचा अनुभव असून गर्दीने खचाखच भरलेली रेल्वेगाडी त्या लीलया चालवतात.  आपल्या कामातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे.
    ·       रीमा साठे या हॅपी रुटस्‌च्या संस्थापक आहेत. विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी 12 हजार छोटया आणि आदिवासी शेतकऱ्यांचे थेट कृषि उत्पादन सोर्सिंग नेटवर्क विकसित केले आहे.
    नारी शक्ति पुरस्कार
    -          विविध क्षेत्रातील महिलांच्या यशाला पोच म्हणून भारत सरकारकडून हा पुरस्कार दिला जातो.
    -          महिला व बालकल्याण मंत्रालयाद्वारे दिल्या जाणार्‍या या पुरस्करची 1999 मध्ये सुरुवात करण्यात आली.
    -          या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

    जल क्रांति अभियान
    जल क्रांति अभियानावरील राष्ट्रीय परिषद नुकतीच दिल्ली येथे पार पडली. जलसंसाधन, नदी व्यवस्थापन आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
    काय आहे जल क्रांति अभियान?
    -          देशातील जल संवर्धन आणि व्यवस्थापन बळकट करण्यासाठी 5 जून 2015 रोजी जल क्रांति अभियान सुरू  करणात आले.
    -          अभियानाचे चार प्रमुख घटक आहेत: जल ग्राम योजना, कमांड एरियाचा विकास, प्रदूषणात कपात आणि जागृती कार्यक्रम.
    -          योजने अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड करून त्या गावाची जल सुरक्षा प्राप्त करण्यात येणार आहे.
    -          आत्तापर्यंत 828 लक्ष्यित गावांपैकी 726 गावांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

    अल नगाह-2 (Al Nagah-II 2017)
    ·        भारत आणि ओमान लष्कर सराव Al Nagah-II 2017 नुकताच हिमाचल प्रदेश मध्ये पार पडला.
    ·        ही या सरावाची दुसरी आवृत्ती होती. यापूर्वी हा सराव 2015 मध्ये मस्कत (ओमान) येथे पार पडला.

    सूर्य किरण – 11
    भारत नेपाळ संयुक्त लष्कर सराव सूर्यकिरण-11 पिथोरगड येथे नुकताच पार पडला. ही या सरावाची अकरावी आवृत्ती होती. यामध्ये नेपाळच्या दुर्गा बक्ष बटालियन आणि भारताच्या एकता शक्ति बटालियनने सहभाग घेतला होता.

    पंजाब कृषी विद्यापीठाने भारतातील पहिली बीटी कापूस जात यशस्वीरित्या विकसित केली आहे. आयसीएआरने पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये लागवडीसाठी PAU BT1, F1861 आणि RS 2013 या तीन जातींना मान्यता दिली आहे.

    टाइम्स हायर एद्युकेशनच्या क्रमवारीत IIS
    ·       टाइम्स हायर एद्युकेशनच्या टॉप 10 सर्वोत्कृष्ट लहान विध्यपीठाच्या (2017) च्या क्रमवारीत भारतीय विज्ञान संस्थेने (IIS) स्थान मिळविले आहे. या क्रमवारीत IIS ला आठवे स्थान प्राप्त झाले आहे.  
    ·       यामध्ये 5000 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या विध्यपीठांचा विचार करण्यात आला आहे.
    ·       IIS ही आशियाई विध्यपीठांमध्ये दुसर्‍या स्थानी आहे.
    ·       या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी आहे.
    #IIS ही एक वैज्ञानिक संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी सार्वजनिक विद्यापीठ असून 1909 मध्ये IIS ची स्थापना करण्यात आली. तत्कालीन म्हैसूरचा महाराजा कृष्णराजा वाडेयर (चौथा) आणि जमशेदाजी टाटा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.
    # टाइम्स हायर एद्युकेशन जागतिक विद्यापीठ क्रमवारीची स्थापना 2004 मध्ये टाइम्स हायर एद्युकेशन (THE) या मासिकाकडून करण्यात आली.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad